अक्षरविचार आणि गणविचार

अक्षरविचार    अक्षर म्हणजे एकावेळी तोंडातून बाहेर पडणारा ध्वनी होय, मग तो ध्वनि लिहून दाखवायला लिपीतील चिन्ह एक लागो वा अनेक लागोत. अक्षराचे अधिष्ठान स्वरावर असते, मग त्यात आरंभी वा अंती व्यंजनोच्चार मिळो वा न मिळो. राजन् या शब्दाच्या लेखनाकडे पाहून आपण यांत रा ज न् अशी तीन अक्षरे आहेत म्हणून म्हणतो, पण हे चूक आहे. वस्तुतः रा ज न् दोन अक्षरे आहेत.शब्दांत जितके स्वर तितकीच अक्षरे होणार. रा हे अक्षर आकारान्त म्हणजे स्वरान्त आहे. तर जन् हे अक्षर व्यंजनान्त आहे. स्वरान्त अक्षराला विवृत्त म्हणतात आणि व्यजनान्त अक्षराला संवृत्त म्हणतात.
    स्वराच्या ऱ्हस्वदीर्घतेप्रमाणे स्वाभाविकपणेच विवृत अक्षर उच्चारायला न्यूनाधिक काळ लागतो. दीर्घ स्वर उच्चारायला लागणारा काळ ऱ्हस्व स्वर उच्चारायला लागणाऱ्या काळाच्या दुप्पट गणावा असा स्थूल संकेत आहे. ऱ्हस्व स्वर उच्चारायला एक मात्रेचा वेळ लागतो असे म्हटले तर दीर्घ स्वराच्या दोन मात्र होतात. ऱ्हस्वस्वरान्त अक्षराला लघू आणि दीर्घ स्वरान्त अक्षराला गुरू म्हणतात. आधुनिक मराठीत अ, इ, उ हे तीन स्वर ऱ्हस्व आणि आ, ई, ऊ, ए, ऐ, ओ, औ हे सात स्वर दीर्घ मानावेत ही मर्यादा पाळली जात आहे. लघुगुरूसाठी अनुक्रमे (   ̱  ) आणि (   ̮  ) ही चिन्हे आहेत.

गणविचार    गण म्हणजे चरणाचा स्वाभाविकपणे पडणारा भाग होय. पद्य जर आवर्तनी असेल तर चरणांत ठराविक कालांत उच्चारल्या जाणाऱ्या अक्षरांचे जे गट पडतात ते स्वाभाविक गण होत. हे सदैव एकाच अक्षरसंख्येचे आणि लगक्रमाचे कसे असतील ? "अच्युतं केशवं रामनारायणम् या चरणांत (  ̱   ̮   ̱ ) असे त्र्यक्षरी गण चार पडतात, तर “धुनोतु नो मनोमलं कलिन्दनंदिनी सदा” या चरणांत  (   ̮   ̱   ̮   ̱  ) असे चतुरक्षरी गण चार पडतात.


पिङ्गलोक्त त्रिक    वृत्ताचे लक्षण म्हणजे चरणांतील अक्षरांची संख्या आणि लगक्रम ही सांगण्याच्या ज्या अनेक शास्त्रोक्त पद्धती आहेत त्यापैकी पिङ्गलाच्या पद्धतीत त्यक्षरी, त्रिकांची योजना आहे. ही पद्धती अधिक रूढ झाल्यामुळे     गण हे त्र्यक्षरीच असले पाहिजेत हा समज रूढ झाला आहे.
    'यमाताराजभनसलगम्' या सूत्राने पिङ्गलाने सांगितलेल्या गणांची नावे आणि स्वरूपे बांधून टाकली आहेत. कोणतीही तीन अक्षरे क्रमाने घेतली असता त्या त्या त्र्यक्षरी शब्दाचे जे लगत्वरूप होते ते     त्यातील आद्याक्षराने निर्दिष्ट होणाऱ्या गणांचे स्वरूप होय.


        यमाचा (   ̮   ̱    ̱  )
        मानावा (   ̱   ̱   ̱  )
        ताराप (   ̱   ̱  ̮  )
        राधिका (   ̱   ̮   ̱  )
        जनास (   ̮   ̱   ̮  )
        भास्कर (  ̱   ̮   ̮  )
        नमन (   ̮   ̮   ̮   )
        समरा (   ̮   ̮   ̱  )
    ही य, म, त, र, ज, भ, न आणि स या गणांची रूपे आहेत.ल हे अक्षर लघूदर्शक (   ̱  ) असून ग (   ̮  ) हे अक्षर गुरूदर्शक आहे.





गझलचर्चा: 

प्रतिसाद

मीटर म्हणजे वजन किंवा बहर!
उर्दू गझलेतील मीटरला सहसा बहर म्हणतात, मराठी मधे वजन वा वृत्त हा शब्द वापरतात.
मीटर्/वृत्त/बहर यांचा अर्थ!
वरील ओळीतील अक्षरांच्या मात्रा खालील ओळीतील मात्रांशी जुळणे व हे करताना लय न बिघडू देणे किंवा यतीभंग न होऊ देणे!
समजा एक मीटर घेतले
गा ल गा ल गा ल गा       गा ल गा ल गा
२  १   २  १   २  १  २         २  १  २  १  २ = १९
आ ज का ल ती ज रा       हा स ते त री
आता इथे 'जरा' नंतर एक पॉज येत आहे अन मग 'हासते' हा शब्द उच्चारला जात आहे.
पुढची ओळ समजा अशी घेतली:
त्या हु नी म ला त री      का य पा हि जे ?
२    १   २  १  २ १  २       २    १  २  १  २
तर ही ओळ बसेल कारण फक्त मात्राच बरोबर आहेत असे नाही तर गुरू व लघू अक्षरांचा क्रमही समान आहे. त्याऐवजी जर अशी ओळ केली.......
म ला त री त्या हु नी     का य पा हि जे
१ २    १  २   २  १ २       २   १   २ १   २
तर 'मला तरी' नंतर 'त्याहुनी' म्हणताना आणखीन एकदा थांबावे लागेल. म्हणजे मात्रा बरोबर असूनही अडखळायला होते. हा एक 'फील' असावा लागतो.  तो अभ्यासाचा विषय कमी असून जाणवण्याचा विषय जास्त आहे. संगीताची जाण असलेल्यांना ते अवघड नाही.

 

अज्ञ बालक मोठ्ठे मोठ्ठे शब्द बोलते की? गंमतच आहे.

अज्ञ बालकाची अवस्था ज्ञानाभिलाषेऐवजी 'ज्ञानाभिलाशी' अशी मखलाशीसारखी का बरे आहे?

     आधुनिक मराठी गझलेचे भावस्पर्शी आणि गहिरे रुप दाखवुन देणारया सर्व गझलकरास प्रणाम.
      गझलेच्या बाबत रदिफ, काफिया, व्रुत्त, मीटर हे शब्द सतत कानावर पडतात. रदिफ, कफियाशी मी थोडाफार परिचित आहे. पण मीटर म्हणजे काय?
     मी कवि वा गझलकार नही. ती माझी पात्रता हि नव्हे. मी एक रसग्रहण करणारा वाचक आहे. पण नियम समजल्यास रसग्रहण परिपूर्ण होईल असे वाटते.
     अभ्यासू माहीती देतील हि अपेक्षा.
     पुन्हा एकदा आभार.
 
   ज्ञानाभिलाशी,
    अज्ञ बालक.