ऋतुंची ऐकली कुजबूज मी

ऋतुंची ऐकली कुजबूज मी... लावण्य आल्यावर
मला कळवायचे नाहीस का तारुण्य आल्यावर?

जगामध्ये मला धाडायचे होतेस देवा तू......
हवा तो चेहरा धारायचे नैपुण्य आल्यावर

सुखे येतात कुठलाही इतर पर्याय नसला की
उजवती लेक कोठेही जशी वैगुण्य आल्यावर

अता वाल्मीकि वाल्या जाहला,..... हसली मुले बाळे
कुणी वाटेकरी नव्हता नशीबी पुण्य आल्यावर

नको पाहूस नवलाने, तुझी काही चुकी नाही
सरावाने उजळतो मी अता कारुण्य आल्यावर

टीप - मतल्यात अलामत सूट

गझल: 

प्रतिसाद

सुंदर गझल बेफिकिर....
खूप आवडली.
सुखे येतात कुठलाही इतर पर्याय नसला की
उजवती लेक कोठेही जशी वैगुण्य आल्यावर

क्या बात है! :-)

धन्यवाद मधुघट!

अता वाल्मीकि वाल्या जाहला,..... हसली मुले बाळे
कुणी वाटेकरी नव्हता नशीबी पुण्य आल्यावर

बेफिकीर साहिब, बहोत खूब.... छान गज़ल...
` ख़लिश '- वि. घारपुरे / १५-०३-२०१०.

वा
मस्तच गझल.

बहोत खुब !!!

सुंदर गझल.
जाम आवडली.

सुखे येतात कुठलाही इतर पर्याय नसला की
उजवती लेक कोठेही जशी वैगुण्य आल्यावर

नको पाहूस नवलाने, तुझी काही चुकी नाही
सरावाने उजळतो मी अता कारुण्य आल्यावर

सुंदर !

सुखे येतात कुठलाही इतर पर्याय नसला की
उजवती लेक कोठेही जशी वैगुण्य आल्यावर

नको पाहूस नवलाने, तुझी काही चुकी नाही
सरावाने उजळतो मी अता कारुण्य आल्यावर

अति सुंदर शेर !
वाल्याचा शेर मात्र कळू शकला नाही.

इतर कुठलाही पर्याय नसला की सुखे येतात??
मग नाही कळला शेर...

नको पाहूस नवलाने, तुझी काही चुकी नाही
सरावाने उजळतो मी अता कारुण्य आल्यावर
वा वा...

मतला आणि ३रा शेर आवडला.
मात्र, लावण्य आल्यावर.... म्हणजे कोणाला लावण्य आल्यावर हे स्पष्ट झाले नाही असे वाटते.
सुखे येतात कुठलाही इतर पर्याय नसला की...
इथेच विषय संपला आहे असे वाटते. पुढील ओळीत फक्त उदाहरण आहे. हेच उलटे असते तर....? या गझलेत बसले नसते हे नक्की. पण चांगले वाटले असते असे वाटते.

सर्वांचे आभार!

ज्ञानेश,

वाल्मीकिजवळ पुण्य असल्याने त्या पुण्याचे घरात कुणीच वाटेकरी व्हायला तयार नव्हते. (कलियुग आहे.) याचे कारण पुण्य करण्यासाठी करावा लागणारा सुखांचा / ऐष आरामाचा त्याग सहन होणारा नव्हता. त्याचा पुन्हा 'वाल्या' (म्हणजे पापी) झाल्यावर सर्व सुखे दारात आली.

अजय,

'म्हणजे कोणाला लावण्य आल्यावर' हे विधान रम्य वाटले.

'पहिल्या ओळीत मुद्दा संपणे व दुसर्‍यात उदाहरण - गझलांमधे अनेक प्रकारचे शेर झाले आहेत. काहीत आशय विभागला जातो, काहीत आधी उदाहरण येते, काहीत दोन्हीत नुसती वर्णने होतात (हे बहुतांशी मतल्यात होते) , काहीवेळा असंबद्ध मुद्दे दोन ओळीत असल्याचीही उदाहरणे (मराठीतही) आहेत (व हेही अनेकवेळा मतल्यात होऊ शकते). त्याचप्रमाणे येथे आपण म्हणता आहात ते बरोबर आहे की मुद्दा पहिल्या ओळीत व उदाहरण दुसर्‍या ओळीत. असेही शेर आहेत असे वाटते.

धन्यवाद!

बेफिकीर,
'पहिल्या ओळीत मुद्दा संपणे व दुसर्‍यात उदाहरण - गझलांमधे अनेक प्रकारचे शेर झाले आहेत. काहीत आशय विभागला जातो, काहीत आधी उदाहरण येते, काहीत दोन्हीत नुसती वर्णने होतात (हे बहुतांशी मतल्यात होते) , काहीवेळा असंबद्ध मुद्दे दोन ओळीत असल्याचीही उदाहरणे (मराठीतही) आहेत (व हेही अनेकवेळा मतल्यात होऊ शकते).
हे सर्व बरोबर आहे. परंतु, इथे दुसर्‍या ओळीमुळे शेर थोडा खाली आला आहे असे वाटते. अर्थात, हे माझे वैयक्तिक मत आहे. पहिली ओळ वाचल्यानंतर आता पुढे आणखी काय येईल असे वाटत असताना दुसरी ओळ वाचल्यानंतर रसभंग झाल्यासारखे वाटले. (माझा रसभंग आशयाने होतो, ळुळूने नाही.) असो. शेवटी निर्णय गझलकाराचाच.

नको पाहूस नवलाने, तुझी काही चुकी नाही
सरावाने उजळतो मी अता कारुण्य आल्यावर

वा!

धन्यवाद चित्तरंजन!

''अता वाल्मीकि वाल्या जाहला''सोडून सर्वच शेर आवडलेत....!!!
और भी आने दो...!