अस्वस्थ

उगाच काही क्षण हे करती अस्वस्थ
रित्या मनाला येते भरती अस्वस्थ

हले पिसारा सखये तुझिया केसांचा
उठे शहारा शरिरावरती अस्वस्थ

अजून जागर भवती घुमतो स्वप्नांचा
कितीक रात्री माझ्या सरती अस्वस्थ

इथे फुलांना ओझे छळते बहरांचे
खुळ्या दवाचे सलही ठरती अस्वस्थ

पहाटवेळी सलतो वारा अंगाशी  -
झरे सुखांचे हृदयी झरती अस्वस्थ

कुठे दिसेना ढगही गगनी एखादा -
जळे उन्हाने व्याकुळ धरती अस्वस्थ

                प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी, उदगीर

 

गझल  वाचण्यापूर्वी  / नंतर - या गझलेतील रदीफ (अस्वस्थ) हा अटळ होता. त्याच्याबाबतीत काही जाणकारांना असे वाटू शकेल की,  'अस्वस्थ'च्या मात्रा तर पाच होतात!  खरेही आहे; पण गद्यात किंवा इतर पद्यात जिथे हा शब्द कुठेतरी ओळीत येत असेल तिथे. मात्र याबाबतीत माझे म्हणणे असे की, 'अस्वस्थ' हा शब्द जेव्हा रदीफ म्हणून / शेवटी येतो, तेव्हा,  '-स्थ'चा उच्चार हटकून दीर्घ होतो. त्यामुळे दीर्घोच्चारी शब्दाच्या मात्रा त्याला द्यायला हव्यात. निर्णय तुमच्या हाती !!!
कृपया, (असेल तर) आक्षेप अवश्य कळवावा !

 

गझल: 

प्रतिसाद

उगाच काही क्षण हे करती अस्वस्थ
रित्या मनाला येते भरती अस्वस्थवाव्वा.. रित्या मनाला अस्वस्थ भरती येणे फार आवडून गेले. गझल चांगलीच आहे. सगळेच शेर आवडले. 

सुरेख गझल! २रा आणि ४था शेर फारच आवड्ले.


म्हणतो.
विश्वास

रदीफ नाविन्यपूर्ण. सुंदर रचना.
उगाच काही क्षण हे करती अस्वस्थ
रित्या मनाला येते भरती अस्वस्थ
अजून जागर भवती घुमतो स्वप्नांचा
कितीक रात्री माझ्या सरती अस्वस्थ
हे दोन्ही शेर फार आवडले.

अजब

.गझल  वाचण्यापूर्वी  / नंतर - या गझलेतील रदीफ (अस्वस्थ) हा अटळ होता.
त्याच्याबाबतीत काही जाणकारांना असे वाटू शकेल की,  'अस्वस्थ'च्या मात्रा
तर पाच होतात!  खरेही आहे; पण गद्यात किंवा इतर पद्यात जिथे हा शब्द
कुठेतरी ओळीत येत असेल तिथे. मात्र याबाबतीत माझे म्हणणे असे की,
'अस्वस्थ' हा शब्द जेव्हा रदीफ म्हणून / शेवटी येतो, तेव्हा,  '-स्थ'चा
उच्चार हटकून दीर्घ होतो. त्यामुळे दीर्घोच्चारी शब्दाच्या मात्रा त्याला
द्यायला हव्यात. निर्णय तुमच्या हाती !!!
कृपया, (असेल तर) आक्षेप अवश्य कळवावा !

आक्षेप असण्याचा प्रश्न नाही. ज्याचा त्याचा सवाल आहे. अस्वस्थच कशाला कुठलाही  'अ'कारान्त शब्द ओळीच्या शेवटी आला की त्याचा उच्चार दीर्घ करतात. पण 'स्थ' मुळे कदाचित तो दीर्घ उच्चार अधिक अधोरेखित होत असावा.

याबाबतीत, दादांनी एका ठिकाणी स्पष्ट केलेलं आहेच. पद्य ओळीतील शेवटचा शब्द विनाकारण उच्चार लांबवण्याला (तशा सवयीला) त्यांनी आक्षेप घेतला आहे आणि त्यांचे ते मत मा़झेही आवडते मत आहे. असे असूनही हा शब्द त्यातून वगळता येतो, असे माझे म्हणणे.

कुणा काय सांगू कसे ते कळेल
तराजू मनाचा कुठेसा ढळेल
(संतोष कुलकर्णी)
या शेरात तसे होत नाही. इथे शेवटचे अक्षर र्‍हस्वच राहते. पुढच्या ओळींत मग हे या जमिनीचे 'इमान' कायम ठेवणे आवश्यक ठरते. आपण म्हणता त्याप्रमाणे हा प्रश्न ज्याचा त्याचा न व्हावा. त्यात धोका आहे. असे प्रश्न प्रत्येकाने 'ज्याचे त्याचे' ( आपापल्या सोयीने आपापले) मानल्यामुळेही गझलेचे नुकसान काही जणांकडून (अगदी मान्यवरांसह) झाले आहे. यास्तव या चर्चेची गरज मांडली. चूक भूल द्यावी घ्यावी.
संतोष
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०

उगाच काही क्षण हे करती अस्वस्थ
रित्या मनाला येते भरती अस्वस्थ....वा वा वा...

इथे फुलांना ओझे छळते बहरांचे
खुळ्या दवाचे सलही ठरती अस्वस्थ ....छान

कुठे दिसेना ढगही गगनी एखादा -
जळे उन्हाने व्याकुळ धरती अस्वस्थ....सुंदर

रदीफासंबंधी मी मांडलेल्या भूमिकेवर आपलेही मत आवश्यक. कृपया, संदर्भासाठी  चित्तरंजन व मी यांच्यातील निरोपव्यवहारही पहावा.
पुनश्च धन्यवाद!
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०

मतला आणि पहाटेचा वारा मस्तच !!

"अंस्वस्थ" मधला "स्थ" लघु न मानण्याचे कारण ते एक वजन असलेले जोडाक्षर आहे हेच असेल तर ते तितकेसे पटत नाही. असे अपवादही तयार करायचे तर एखाद्या सुस्पष्ट नियमावर (मग तो नवीन नियम असला तरी चालेल) आधारीतच हवेत अन शिवाय या नियमाबरोबर काही ठळक उदाहरणेही हवीत असे मला वाटते. चु.भू.द्या.घ्या.
-- पुलस्ति.

मुद्दा शिर्षकातच स्पष्ट होतो , नाही का ?

अजून स्पष्टपणे सांगाल का?
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०

मनापासून...
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०

मनापासून.....
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०