उसवित बसले बूड कवी हे ज्या झोळ्यांचे

वादळ आल्यावर जे होते पाचोळ्यांचे
ती आली अन् तैसे झाले या डोळ्यांचे

लाकुड तोड्याने सोने लाथाडुन जावे,
इतके का गरजेचे खपणे त्या मोळ्यांचे?

बंक्यासाठी ज्ञान्याने भरलेल्या तेव्हा
उसवित बसले बूड कवी हे ज्या झोळ्यांचे

परदेशाहुन आल्यापासुन 'तसली' फडकी
भाव किती खाली गेले बघ ना चोळ्यांचे

कोण्या काळी जो गरुडांची काशी होता
देश अता तो घरटे झाला पाकोळ्यांचे

गझल: 

प्रतिसाद

वादळ आल्यावर जे होते पाचोळ्यांचे
ती आली अन् तैसे झाले या डोळ्यांचे

व्वा !!!.....मतला वाचतानाच भिरभिर्णारे डोळे नजरेसमोर येतात...

आपला गजल लेखनाचा वेग विलक्षण आहे.

छान गझल.

डॉ.कैलास

भाव किती खाली गेले बघ ना चोळ्यांचे
छान. नर्मविनोदी.

वादळ आल्यावर जे होते पाचोळ्यांचे
ती आली अन् तैसे झाले या डोळ्यांचे
म्हणजे काय? डोळे उडून गेले की काय?

कैलासजी,
एकुण उत्साह कमी व्हायला लागलेलाच आहे. आता गझल लेखनाचा वेगही कमी होइल हळूहळू.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

@ अजयजी
वादळ आल्यावर जे होते पाचोळ्यांचे
ती आली अन् तैसे झाले या डोळ्यांचे
म्हणजे काय? डोळे उडून गेले की काय?

आपण जेष्ठ आहात. आपली बुद्धी जीथवर जाइल तो अर्थ घ्यावा. अगदीच हीन /क्षुद्र अर्थ लागत असेल तर तो माझाच दोष आहे असे मनात कसलाही किंतु न ठेवता समजावे.

लाकुड तोड्याने सोने लाथाडुन जावे,
इतके का गरजेचे खपणे त्या मोळ्यांचे?
- हा शेऱ छान आहे माझ्यामते. वेगळा आहे. मतलाही छान.
हबा,
प्रत्येकाची मते असतात. त्याने नर्व्हस होऊ नका. लिहित रहा... शोध चालू ठेवा...
शुभेच्छा लिखाणासाठी
धन्यवाद.

प्रणव.प्रि.प्रजी
अचानक अनपेक्षीत वातावरणाला सामोरे जावे लागले. मला जसे कधीच व्हायचे नसते तसे व्हावे लागले. असो, मार्गदर्शन करत रहा.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!

पहिला आणि शेवटचा शेर छान आहे.
लिहित रहा.

शुभेच्छा !

ह.बा.
प्रणव आणी ज्ञानेश यांनी दिलेला सल्ला मोलाचा आहे..... लिहित रहा.

डॉ.कैलास

वादळ आल्यावर जे होते पाचोळ्यांचे
ती आली अन् तैसे झाले या डोळ्यांचे
म्हणजे काय? डोळे उडून गेले की काय?

म्हणजे डोळे सैरावैरा झाले असतील. छान आहे मतला. आवडला. लाकूडतोड्याचाही.


कोण्या काळी जो गरुडांची काशी होता
देश अता तो घरटे झाला पाकोळ्यांचे

माझ्यामते भाषणातल्या विधानासारखा सपाट शेर आहे. पण म्हणायचे ते छान मांडले आहे.

शुभेच्छा.

उत्साह कमी कशाला व्हायला लागलाय? उलट आपल्याकडे कित्येक नवीनच विषय आहेत.

मतला व झोळ्यांचे हे दोन्ही शेर आवडले.

आपले नाव काय?

चित्तरंजनजी,
धन्यवाद!

बेफिकीरजी,
हणमंत बाबुराव शिंदे

कोण्या काळी जो गरुडांची काशी होता
देश अता तो घरटे झाला पाकोळ्यांचे

मस्त गझल ,वेगळा विषय !
प्रशांत

आपल्या कवितेबद्दल दरवेळी अनुकूल प्रतिक्रियाच उमटतील असे संभवत नाही. प्रतिक्रिया वाचून निराश होण्याचे कारण नाही. कवीचा आपल्या कवितेवर विश्वास असला पाहिजे.

आपणास गझल उमगली आहेच, जस जसे लिहीत रहाल तसतशी कविता समृद्ध होत जाईल. आपणास माझ्या शुभेच्छा !

कैलास,
भिरभिरणारे डोळे बद्दल अजून विचार करा. केवळ भिरभिरणे वाटत नाही. कारण वादळ आहे.

चित्तरंजन,
डोळे सैरावैरा झाले असतील ... हाही एक विनोदच आहे.
तुम्हाला 'सैरभैर' किंवा 'अस्थिर' असे म्हणायचे आहे काय? कारण, डोळे सैरावैरा होणे (चकणे होणे ) - असा प्रयोग हास्यास्पद वाटतो.

ह बा,
वादळ आल्यावर जे होते पाचोळ्यांचे
ती आली अन् तैसे झाले या डोळ्यांचे
या शेरात वादळ आणि ती हे कॉम्बिनेशन चांगले वाटते. मात्र, वादळासारखी भयानक गोष्ट आल्यावर पाचोळ्यासारख्याचा विचार करणे फारसे उचित वाटत नाही. वादळात घरे पडणे-उद्ध्वस्त होणे, गाव उठणे किंवा झाडेच उन्मळून पडणे वगैरे गोष्टी घडत असतात. पाचोळा काय साधा वारा आला तरी उडून जातो. त्यासाठी वादळ येण्याची वाट कशाला? वादळा सोबत पाचोळ्याचा उल्लेख मला तरी योग्य वाटत नाही.

दुसरे म्हणजे, पाचोळ्याबरोबर डोळ्यांचा उल्लेख काफिया जुळवण्यासाठी योग्यच आहे. परंतु, वादळाबरोबर तिची तूलना जशी चपखल बसते, तशी पाचोळ्याबरोबर डोळ्यांची बसत नाही असे मला वाटते. ती वादळाप्रमाणे आहे आणि मी पाचोळ्याप्रमाणे क्षुल्लक आहे हा विचार ठीक. पण डोळे? डोळे उद्ध्वस्त झाले हे जरा विचित्र वाटते.

तिसरा विचार म्हणजे जर तुम्हाला असे म्हणायचे असेल की, वादळात जसा पाचोळा वर उडून गरगर फिरू लागतो त्याप्रमाणे ती आल्यावर माझे डोळेही गरगर फिरू लागतात. परंतू, हा प्रसंग मी डोळ्यासमोर आणून पाहिल्यावर मला फार विनोदी वाटला. (ती येते आहे आणि माझे डोळे गरगर फिरत आहेत.) यातही, पाचोळ्यासारखी सामान्य गोष्ट गरगर फिरण्यासाठी वादळाची आवश्यकता नाही असे मला वाटते.

कल्पना छान आहे. माझ्या मते मतला बदलून किंवा दुसरा घेऊन ही कल्पना आणखी चांगल्या पद्धतीने मांडता येईल.
प्रत्येकाला मते असतातच. तसे आपल्यालाही असते. कोणाच्याही मतानुसार काहीही करण्याची आवश्यकता नसते. मीही असेच करतो. इतरांची मते लक्षात घ्यावीत ती अभ्यास म्हणून, सल्ला म्हणून नव्हे. माझ्या लिखाणवर तर विनाकारण वेडीवाकडी टीका होत होती. काही लोकांनी तर अजूनही दुर्लक्षच केले आहे. कारण, त्यांचे दोष समोर येतात म्हणून.

बाकी, इतरांनी मतला चांगला म्हटल्याने इतका विचार करायचा की नाही हा सुद्धा एक प्रश्नच आहे.

ह बा, मी मानलेले सूत्र : मनाला नेहमी मोठेच ठेवावे, पण आव मात्र आणू नये.

पुढील लेखनास शुभेच्छा!

ज्ञानेशजी
प्रशान्तजी
अनंतजी
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!

मी केलेला विचार :
वादळात झाडे उन्मळुन पडतात. पत्रे उडून जातात. कारण ती आपल्या ठीकाणी घट्ट असतात. पाचोळा मात्र वादळाची वाट बघत असल्यासारखा ते आल्याबरोबर कसलाही विरोध न करता त्याच्यासोब त फिरू लागतो. वादळ शमतं आणि पाचोळाही. घरं पुन्हा बांधावी लागतात झाडं उभारताच येत नाहीत. पाचोळ्याला कसलीही इजा होत नाही जणु काय तो वादळाचाच एक भाग असावा.
@ अजयजी,
आपण दिलेल्या प्रतिसादातील काही भाग मोलाचा आहे.
पण हा भाग
डोळे सैरावैरा झाले असतील ... हाही एक विनोदच आहे.
तुम्हाला 'सैरभैर' किंवा 'अस्थिर' असे म्हणायचे आहे काय? कारण, डोळे सैरावैरा होणे (चकणे होणे ) - असा प्रयोग हास्यास्पद वाटतो.
हा उ थळपणे आणि अज्ञातुन दिलेला प्रतिसाद वाटला.

तरीही वेगळा मतला लिहीण्याचा प्रयत्न करतोय :

वावटळीशी जैसे रिंगण पाचोळ्यांचे
तैसे तिजला आलींगन माझ्या डोळ्यांचे

मार्गदर्शन अपेक्षीत.

हबा,
वादळात झाडे उन्मळुन पडतात. पत्रे उडून जातात. कारण ती आपल्या ठीकाणी घट्ट असतात. पाचोळा मात्र वादळाची वाट बघत असल्यासारखा ते आल्याबरोबर कसलाही विरोध न करता त्याच्यासोब त फिरू लागतो. वादळ शमतं आणि पाचोळाही. घरं पुन्हा बांधावी लागतात झाडं उभारताच येत नाहीत. पाचोळ्याला कसलीही इजा होत नाही जणु काय तो वादळाचाच एक भाग असावा.

तुमचा विचार अगदी योग्य आहे. मस्त वेगळा आहे. माझ्यामते मतला अजिबात बदलू नये. नव्या मतल्यामध्ये पहिली मजा येत नाही. मुळात त्या शेराचे अनेक अर्थ निघतात ही चांगलीच गोष्ट आहे की. असंच हवं असं मला वाटतं.

आणि एक गोष्ट अतिशय प्रामाणिकपणे सांगावीशी वाटते ती अशी की स्वतःच स्वतःचे मार्गदर्शक व्हा! स्वतःच शोध घ्या. विचार करा. कारण ही कविता तुमची आहे तुमच्या अनुभवांचं आणि विचारांचं प्रतिबिंब आहे. मग ते तुमच्यासारखंच हवं. असो ही माझी वैयक्तिक मतं आहेत. पटल्यास घ्या. मार्गदर्शन वृत्ताच्या बाबतीत म्हणाल तर तो सरावाचा भाग आहे. कोणत्या कोणत्या वृत्तामध्ये कविता लिहिल्या याला महत्त्व नसून काय सांगितलं, कसं मांडलं हे महत्त्वाचं आहे. वृत्त हे माध्यम आहे. पुन्हा हे माझं वैयक्तिक मत. असो. शुभेच्छा

असो. फकीर चालला शोध घ्यावया....

पाचोळ्याला कसलीही इजा होत नाही जणु काय तो वादळाचाच एक भाग असावा.

फार चांगला विचार! पण गझलेत दिसणारा विचार 'वरीलसारखा' आहे हे जाणवत नाही. माझ्यामते एका मतल्यावरील चर्चा अनावश्यक लांबली आहे. डोळे म्हणजे मन आहे किंवा डोळे म्हणजे व्यक्तीमत्व आहे हे गृहीत धरावे लागत आहे व 'गृहीत धरायचेच असते' असे सांगणारे काही नव-प्रस्थापित (यात 'दुखावणारे काहीही नाही) प्रतिसाद 'ताबडतोब' येतील असा अंदाज आहे. तरीही, मतल्यातून एक 'फील' जरूर येत आहे. पान पान लिहिण्याइतके मात्र मतल्यात काहीही नाही (असे मला वाटते).

हणमंत बाबुराव शिंदे - हे नाव मी 'फक्त' (माझ्यापुरते) मान्य करत आहे.

तरीही, मतल्यातून एक 'फील' जरूर येत आहे.
- धन्यवाद!
मी तुमच्या प्रतिसादाची वाट पाहत होतो. (म्हणजे कंप्युटरच्या वायरी फाडुन अक्षरं सापडतात का ते पाहत बसलेलो असे नव्हे.)
हणमंत बाबुराव शिंदे - हे नाव मी 'फक्त' (माझ्यापुरते) मान्य करत आहे.???????
कळले नाही.

वादळ आल्यावर जे होते पाचोळ्यांचे
ती आली अन् तैसे झाले या डोळ्यांचे

एक चांगला मतला आहे. पाचोळा व डोळे हे चांगले काफिये असून ते व्यवस्थित सांभाळलेले आहेत.

बाकी चर्चेतून काही साध्य झाले नाही असे म्हणायचे होते.

मी तुमच्या प्रतिसादाची वाट पाहत होतो. (म्हणजे कंप्युटरच्या वायरी फाडुन अक्षरं सापडतात का ते पाहत बसलेलो असे नव्हे.) - हे विधान बर्‍यापैकी अनावश्यक व गझलेशी संबंधीत नसावे असे माझे मत!

बेफिकीरजी,
हणमंत बाबुराव शिंदे - हे नाव मी 'फक्त' (माझ्यापुरते) मान्य करत आहे.???????
एवढेच मला कळले नाही. बाकी कळले व तुमचे मत मला मान्यही आहे.

मला एवढेच म्हणायचे आहे की पाचोळा आणि डोळे यांचा शब्दाच्या स्थानानुसार, रचनेच्या मागणी नुसार, गरजे नुसार अर्थ घेतल्यास बरे होइल. असे आपण बर्‍याचदा करतोही.
उदा.
वाटेला डोळे लाउन बसणे.
या वाक्यावर कुणी,
वाटेवर डोळे काढुन ठेवल्यावर हा माणूस इतर कामे कसा करणार?
अहो ती वाट आहे लोक येणार जाणार डोळे तुडवले गेले तर काय करायचे?
इ. प्र श्न विचारणे योग्य होइल का?

एवढ्याश्या गोष्टीवर एवढी मोठी चर्चा?

डोळे सैरावैरा झाले असतील ... हाही एक विनोदच आहे.
तुम्हाला 'सैरभैर' किंवा 'अस्थिर' असे म्हणायचे आहे काय? कारण, डोळे सैरावैरा होणे (चकणे होणे ) - असा प्रयोग हास्यास्पद वाटतो.

मी जे म्हणत आहे, तेच तुम्हीही म्हणत आहात. त्यात वेगळे काहीच नाही. सैरावैरा म्हणजे एकाच जागी ठरू न शकणे. इकडे-तिकडे होणे. डोळे (दृष्टी) सारखे तिच्या हालचालींनुसार इकडे-तिकडे भिरभिरत आहेत. ती म्हणजे वादळ आणि डोळे म्हणजे दृष्टी. नजर. (इथे शब्दशः eye हा अर्थ घेऊ नका. कवीच्या मनात sight असाही अर्थ असू शकेल.) शब्दशः अर्थ घेणाऱया तथाकथित कवींमुळे आणि स्वयंघोषित समीक्षकांमुळे कवीचे आणि कवितेचे मोठेच नुकसान होत असते. ही गोष्ट काही आज घडून येत आहे, असे नाही. अस्वस्थ आत्मे, दुरात्मे सदासर्वकाळ, यत्र तत्र सर्वत्र असतातच. असो.

मस्त गझल!!!!
परदेशाहुन आल्यापासुन 'तसली' फडकी
भाव किती खाली गेले बघ ना चोळ्यांचे
जास्त आवड्ले

कैलासजी धन्यवाद!

हबा... मस्तच. चालू राहुदे जोमात!!

धन्यवाद बहर!!!

@चित्तरंजन... ही दाद प्रतिसादाला आहे!! आहाहा! हे शब्दकोश कुठून आणता हो?