झंझावात - १

आपुलिया बळें नाही मी बोलत...


माझ्या उण्यापुर्‍या पंचेचाळीस वर्षाच्या काव्यलेखनाच्या जीवनात माझे आजपर्यंत एकूण तीन काव्यसंग्रह प्रसिद्ध झालेले आहेतः 'रुपगंधा'(१९६१), 'रंग माझा वेगळा'(१९७४) आणि 'एल्गार'(१९८३).
आता दहा वर्षानंतर मी माझा हा 'झंझावात' नावाचा काव्यसंग्रह महाराष्ट्राच्या हवाली करीत आहे. लिहू लागल्यापासून आजपर्यंत मी जे काव्य लेखन केले, ते फार श्रेष्ठ दर्जाचे किंवा मौलिक होते, असे माझे आजही म्हणणे नाही.
किंवा 'झंझावात' नावाचा हा माझा आयुष्यातील चौथा काव्यसंग्रह म्हणजे मराठी काव्याचे सर्वोच्च शिखर आहे, असाही माझा खरोखर दावा नाही. कवी आणि त्याच्या काव्याचा फैसला सामान्य जनताच करीत असतात. स्वतः कवी किंवा समीक्षक नव्हेत. ज्या भाषेत काव्य लिहिले जाते, त्या भाषेत काव्यलेखन करणाऱ्या कवीचे सर्वोच्च न्यायालय, म्हणजे ती भाषा बोलणारी सामन्य जनताच असते. हे साधे सत्य मला ठाऊक आहे. हे सत्य मी आयुष्यभर स्वतः अनुभवलेले आहे, आणि मराठी समीक्षेच्या एकूण प्रामाणिकपणावर माझा विश्वास नाही. सर्वसाधारणपणे मराठी समीक्षा आधी ठरवून केली जाते.
ज्याच्या त्याच्या जगण्याच्या मूल्यांनुसार ज्याच्या त्याच्या काव्यालेखनाचा व समीक्षेचा सौंदर्यबोध( Aesthetic Sense) असतो. चिमणीच्या खोप्यात आकाशाची चर्चा करणाऱ्यांचा कसला सौंदर्यबोध?
मी येथे आत्मचरित्र लिहायला बसलेलो नाही, पण काव्यलेखन करीत असताना मला वर्षानुवर्षे जो सामजिक अनुभव मिळाला, त्याच अर्क असा:
                         मलाच आली कीव खरोखर मजला हंसणाऱ्यांची
                         हसतानाही त्यांचे हसणे केविलवाणे होते!
                         त्यांनी तर घरट्यातच चिवचिव दिव्यत्वाची केली
                         मी जगलो माणसांत, माझे क्षुद्र घराणे होते!


मी सौंदर्यशास्त्राचा अभ्यास केलेला नाही. जर मी तेवढा विद्वान असतो, तर कवी कशाला बनलो असतो? पण माझा एक सोपा सिद्धांत आहे:
जो फक्त स्वतःवर प्रेम करतो, जो माणसांवर प्रेम करू शकत नाही, ज्याला चीड व संताप येत नाही, तो इसम संवेदनाशून्य असतो, आणि ज्याच्या 'संवेदना' फक्त स्वतःपुरत्याच मर्यादित असतात, तो कोडगा इसम कवीच कशाला, माणूससुद्धा नसतो. म्हणूनच मी कबीर आणि तुकारामाला मानतो!
'आता महाराष्ट्र माझ्या काव्यसंग्रहाचे कसे काय स्वागत करणार आहे?' हा विचार करण्याच्या फंदात मी पडणार नाही. जर मी चांगले लिहिले असेल, तर मराठी जनता 'झंझावात'चे मनमुराद कौतुक करील, आणि जर हा काव्यसंग्रह मराठी जनतेच्या पसंतीला उतरला नाही, तर मी मला नापास समजेन.
पण तसे होण्याची शक्यता फार कमी आहे. कारण त्यांची 'जनता' वेगळी आणि माझी जनता वेगळी! तर ते असो. काही आठवणी आल्या. हसू आले. राहवले नाही, म्हणुन लिहून टाकले, एवढेच.
माझ्या या काव्यसंग्रहात बहुसंख्य गझला किंवा गझल फॉर्ममधील कविता आहेत, मी नुसत्याच गझला का लिहितो? मी नेहमीच्या कविता का लिहित नाही? अनेकजण माझ्यावर नारज आहेत. या बाबतीत माझ्यावर अनेकांचा आक्षेप आहे. पहिली गोष्ट अशी, की 'गझल' म्हणजे माझे व्यसन आहे. ती माझी कमजोरी आहे. मला तिच्यावाचून करमत नाही, आणि तिला माझ्यावाचून करमत नाही. 'तू मन शुदी, मन तू शुदम्' अशी आमची स्थिती आहे. म्हणजे तू मी झालीस, आणि मी तू झालो!
- आणि ज्या प्रकारे व ज्या वातावरणात मी लहानाचा मोठा झालो, त्याचा विचार करता मी आज असे म्हणू शकतो की माझ्याजवळ आपोआप गझल आली. गझलेसारखी गझल! मी इतर काव्यप्रकार उपेक्षणीय समजत नाही. मी नेहमीच्या काव्यरचना तुच्छ समजत नाही. याही काव्यसंग्रहात गझल नसलेल्या माझ्या अनेक काव्यरचना आहेत. ज्याला जे जमेल, ते त्याने करावे. कोणताही काव्यप्रकार हाताळावा. मी प्रत्येक काव्यप्रकार सुंदरच समजतो. हव्या त्या फुलाचा सुगंध घ्यावा!
मी गझलेच्या प्रेमात पडलो, म्हणून मी गेली किमान अडतीस वर्षे मराठी भाषेत गझल लिहित आहे, असेही नाही. मी माझ्या महाराष्ट्रावर आणि माझ्या मायबोलीवर-मराठीवर अक्षरशः प्रेम करतो, म्हणून मी बाकी सारे मोह टाळून उभे आयुष्य मराठी गझल लिहिण्यासाठी जाळले. या प्रदिर्घ कालखंडात मराठी गझलेच्या वाट्याला किती खिल्ली, किती उपेक्षा आणि किती विरोध आला, याची कुणासही कल्पना नाही. चुणूक म्हणून समीक्षेचा मासला: भटंचा भटारखाना!
पण आज मराठी गझल म्हणजे मराठी काव्यातील एक शक्तिशाली वस्तुस्थिती आहे, हे सत्य कुणालाही नाकारता येणार नाही. मराठी माणसांनी- विशेषतः,तरूण पिढीने मराठी गझलेचा संपूर्ण स्वीकार केलेला आहे. येथे' स्वीकार' हा शब्द फार महत्त्वाचा. सोयीनुसार, परवडते म्हणून किंवा 'करीयर'साठी गझल लिहायची नसते. गझलच कशाला, कोणताही काव्यप्रकार हाताळायचा नसतो! जे 'करीयर'साठी गझलेकडे वळले, त्यांची हालत ' न इधर के रहे, न उधरके रहे!' अशी झालेली आहे. केवळ गझलेच्या फॉर्ममध्ये लेखन केले, म्हणूनही ती गझल ठरत नसते.'फॉर्म' सांभाळून केलेल्या निर्जीव लेखनाला 'गझल' म्हणत नसतात.अशी तथाकथित गझल कोणताही परिणाम करीत नसते, आणि ज्याची थांबण्याची तयारी नाही, त्याने गझलेच्या वाटेला जाऊ नये!
खरे तर ज्याच्यात मुळातच दम नसतो, अशा कवीचा कोणताही काव्यप्रकार अपयशीच ठरतो. मग लिहिणारा कुणीही असो. मी कवितेच्या यशाची एक व्याख्या केलेली आहे: जी वाचल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर रसिकाच्या कायम स्मरणात राहते, जिचा नेहमीचा जनजीवनात प्रत्यय येतो, ती यशस्वी कविता!
कुणीही फक्त स्वतःसाठीच कविता करीत नसतो. कारण कविता हा संवाद आहे. अगदी व्यक्तिगत स्वरूपाची कविता वाटत असली, तरी वाचणाऱ्याला किंवा ऐकणाऱ्याला तिच्यात स्वतःच्या जीवनाचे प्रत्यय येत असतात.' अरे हा तर माझाच मनातले बोलतोय्! अरे, असेच घडले की, माझ्या बाबतीत!' असे रसिक म्हणत असतो.
प्रचितीचे बोलणे म्हणजे कविता.
पण जी मराठी माणसाला जाणवत नाही, ती कविता काय? जी नित्यनेमाने पाडली जाते, ती कविता काय? केवळ शब्दांची हगवण म्हणजे कविता काय? किंवा महापुरुषांच्या पवित्र नावांच्या संगिनी छातीवर रोखून आपली कविता महान आहे, असे जुलूम-जबरदस्तीने सर्टिफिकेट मिळवले, म्हणून संबंधीत कवी महान ठरतो काय? जो शिलक राहतो, तोच मोठा! तेथे जात आणि धर्म उपयोगी पडत नाही. तेथे ग्रामीण किंवा शहरी, असा अभिनिवेश कमी पडत नाही. तेथे कळप कामाचे नसतात. सत्य, साधेपणा आणि माणुसकी हीच कवितेची खरी शक्ती असते- मग ते सत्य वैयक्तिक असो किंवा सामाजिक असो. ज्याला सोपे लिहिता येत नाही, तो कवी नसतो. कारन ज्याच्यात धमक नसते, तोच दुबळा व भित्रा इसम साधा उंदीर मारण्यासाठी ऍटम बॉंबचा उपयोग करतो. एक साधी गोष्ट सांगण्यासाठी अगडबंब शब्द कशाला हवेत? तर ते असो.
 मला कवितेच्या बाबतीत जे वाटते, ते मी येथे लिहीलेले आहे. माझी भूमिका रसिक वाचकांनी समजून घ्यावी, म्हणून मी हा प्रयत्न केलेला आहे. बाकी कोणताही अभिनिवेश नाही. माझ्या मर्यादा मला ठाऊक आहेत.
                                     हम कहाँ के दाना थे? किस हुनर में यक़ता थे?
                                     मुफ़्त ही हुआ, 'ग़ालिब' दुश्मन आसमाँ अपना
!
- मी कुठे बुद्धिवान होतो? मी कोणत्या कलेत एकमेव होतो? अरे 'गालिब', दैवाने माझाशी उगीचच वैर धरले!