रस्ता भरलेला असतो अन गर्दी साचत असते

रस्ता भरलेला असतो अन गर्दी साचत असते
जहरील्या फुत्कारांनी हे विश्वच तापत असते

ही ओळख नको कुणाशी मैत्रीही नकोच आता
दे इमेल, फोन व पत्ता ती नुसती बोलत असते

तो तसाच बोलत असतो मी केवळ ऐकत असते
बाहेर बर्फ अन् मागे आधणही वाजत असते

नेहमीच कसे विरोधी येतात विचार मनी ह्या
मी रस्ता घडवत असते मी रस्ता अडवत असते

हे उन्हात छाया देते थंडीत ऊबही देते
या झाडामध्ये बहुधा आईही राहत असते

तेच ते विचारत बसतो, चौकशा किती ह्या करतो
(टोचले असे कापड की तग शिल्लक राहत असते?)

एकट्या अबोल कळीवर भुंग्याला पाहत असते
भेटावे तू ही इच्छा या मनास जाळत असते

-सोनाली जोशी

गझल: 

प्रतिसाद

मात्रावृत्तातही लयबद्धता असायला हवी असे प्रांजळ मत!

अतिशय उत्तम आशयाची गझल आहे.

सोनाली,

पुन्हा वाचली. अतिशय उत्तम आशय! प्रत्येक शेर आशयात उत्तम!

आपण लय सांभाळायला हवीत असे स्पष्ट मत देऊ इच्छितो. चु.भु.द्या.घ्या.

छान आहे गझल.

खुप छान. आई, भुंगा आवडले.

सोनाली,
गझल छान आहे. थोडेसे शब्दरचनेकडे लक्ष देऊन लिहिली असतीत तर वाचायला मजा आली असती. काही शब्दांमुळे काही ओळी फार साध्या वाटत आहेत. जसे, इमेल ची ओळ. असो.

बेफिकीर,
मला असे वाटते, की गझलमध्ये लयबद्धता असावी हा सल्ला असावा, आग्रह नको. आता, तुम्ही विषय काढला आहेत म्हणून. पूर्वीही आपण यावर बोललोच आहोत. शेर हा धनुष्यातुन सुटलेल्या बाणाप्रमाणे असावा. वृत्त वगैरे ठीक आहे. पण, मात्रा वृत्तात लिहिताना लयीपेक्षा आशयाकडेच लक्ष द्यायला हवे. गाता येते ती गझल असे गझलबद्दल आपण मराठी लोकांनी मत केल्यामुळे प्रयत्न करूनही बर्‍याच वेळा ती फार साधी होवून जाते. आपण सर्वांनी गझलकार व्हावे, केवळ गीतकार नव्हे असे मला वाटते. हां, आता सिनेमात वगैरे गाणी गेल्यानंतर प्रसिद्धी मिळते हे खरे. पण, त्याची सवय होवून मूळ तीव्रता कमी होण्याचाही संभव असतो. २-४ सीडीज् निघाल्या तर आपल्यालाही बरे वाटेल. पण..... गझलेच्या शेराची ताकद त्याचा आशय आहे हे आपण सर्वांनी मान्य केल्यानंतर केवळ 'लय' स्वरूपावर विचार करू नये असे मला वाटते. उर्दूमधील कित्येक शेर (ज्यांना लोक दाद देतात) असे आहेत की त्यात लयबद्धता नाही. शेर ऐकवताना गाऊन ऐकवण्यापेक्षा तो बोलावा. त्याने फार मजा येते.
मला असे वाटते की,बर्‍याचवेळा गेय शेरापेक्षा बोली शेरच अधिक भाव खाऊन जातात. गाताना 'पॉझ' ठराविक घेता येतो. बोलताना 'पॉझ'मुळेच मजा येते. असो. हे आपले माझे मत. बाकी निर्णय गझलकाराचा.

पहिले पाच शेर खूप आवडले.

तेच ते विचारत बसतो, चौकशा किती ह्या करतो
(टोचले असे कापड की तग शिल्लक राहत असते?)

वा! गझल चांगली झाली आहे.