आकाश उजळले होते.

इतकेच मला जाताना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते.

     ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही
     मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते.

गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरू या
पाऊल कधी वाऱ्याचे माघारी वळले होते.

     मी ऐकवली तेव्हाही तुज माझी हीच कहाणी
     मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते

नुसतीच तुझ्या स्मरणांची एकांती रिमझिम झाली
नुसतेच तुझे हृदयाशी मी भास कवळले होते.

     याचेच रडू आले की जमले न मला रडणेही
     मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रूंत मिसळले होते.

घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वणवण केली
जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते

     मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो
     मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते.

                                                        -:    एल्गार     :-
      

सुरेश भटांची मला आवडलेली रचना: